खुशखबर.. मुंबई महानगरपालिकेतील 10 हजार पदांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

BMC Bharti 2022 : कोरोना महामारीमुळे मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. मात्र आता या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे १० हजारांहून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता आहे. पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे. त्यात कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली. मात्र आता या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे १० हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारच्या शासन आदेशाच्या पाठोपाठच मुंबई महानगरपालिकाही भरतीबाबतचे एक परिपत्रक जारी करणार आहे.

शासनाच्या अध्यादेशामुळे आता एजन्सी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये एजन्सीसोबत करण्याचे करार, अटी व शर्थी यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळेच पालिकेच्या विविध विभागांमध्ये असलेली मनुष्यबळाची भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करता येणे शक्य होणार आहे. येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेतील विविध विभागांना भरती प्रक्रियेसाठीची एजन्सी नेमून रिक्त जागांची भरती करणे शक्य होईल. परिपत्रक निघाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पुर्ण करणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे नव्या वर्षात जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारकडून फेब्रुवारी, मे आणि ऑक्टोबर असे तीनवेळा भरती प्रक्रियेसाठीचे शासन आदेश निघाले. त्यामुळेच पालिकेलाही यानुसारच परिपत्रक जारी करावे लागणार आहे. याआधीही पालिकेने परिपत्रक जारी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु नव्या आदेशामुळेच हे परिपत्रक जारी करण्यापासून रखडले. आता शासनाचे तिसऱ्यांदा आदेश आल्याने पालिका विविध विभागांना परिपत्रक जारी करणार आहे. त्यानंतरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल.

मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात सध्या १६०० लिपिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यानुसारच पालिकेच्या विविध विभागांमध्ये जागा रिक्त आहेत. पालिकेच्या विविध विभागांच्या गरजेनुसार ही भरती प्रक्रिया आगामी महिन्याभरात सुरू होणे अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या आदेशानुसार टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणे अपेक्षित आहे.

See also  MPSC मार्फत होणार लिपिक-टंकलेखक पदांसाठी मेगाभरती, कधीपासून? वाचा..